Saturday, March 28, 2009

वडील(दादा)

लहानपणीचा छोटासा प्रसंग खूप आठवत राहतो कधी कधी. माझे बालपण छोट्याशा तालुक्‍याच्या गावी गेले. आई-वडील शिक्षक असल्यामुळे शिस्तीत, पण मजेत गेले. मला दहावीला चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. घर सोडून कधी राहिले नसल्यामुळे होस्टेल खूप नकोसे वाटून रडायला यायचे. दोन्ही लहान भाऊ, त्यांच्या बरोबरचे संध्याकाळचे जेवण, गप्पा इ. आठवून पोटात खड्डा पडे.
कॉलेजमध्ये रुळेपर्यंत, तेथील नवीन वातावरणाची सवय होईपर्यंत दिवस काढणे, हा प्रकार चालू होता. बरे, वडील स्वभावाने कडक असल्यामुळे त्यांच्यापुढे काही बोलण्याची हिंमत त्या वेळी माझ्यात नव्हती. आईचेही काही घरात किंवा बाहेर वडिलांसमोर बोलण्याचे धैर्य होत नसे, त्यामुळे तिच्याकडे तक्रार करूनही काही उपयोग नव्हता. आईची महत्त्वाची भूमिका म्हणजे मला लातूरला जाताना चिवडा, चकली, शंकरपाळे इ. पदार्थ पॅक करून देणे, एवढीच. त्या वेळी आतासारखे एवढे डाएटिंग वगैरे फॅड प्रचलित नसल्यामुळे फिगर सांभाळणे वगैरे डोक्‍यात नव्हते. त्यामुळे आईच्या "व्यवस्थित खा' अशा सूचना पाळणे परमकर्तव्य समजून व्यवस्थित आहार घेऊन अभ्यास करणे एवढेच ध्येय.
हे ध्येय साध्य करण्यापूर्वी एक छोटीशी घटना मला बरेच काही शिकवून गेली. माझ्या कॉलेजला न जाण्यामुळे किंवा न रुळण्यामुळे अभ्यासात माझे मुळीच लक्ष लागत नव्हते. त्यात पहिली चाचणी परीक्षा संपली व त्यात मला खूप कमी मार्क मिळाले.
निराश होऊन सारखी सारखी कॉलेज सोडून घरी जायची इच्छा होऊ लागली. वडिलांचा तर मनात प्रचंड राग! माझ्या राहत्या ठिकाणी कॉलेज असताना इकडे शिक्षणास पाठवायची गरजच काय, वगैरे वगैरे विचार यायचे. नंतर तर वडिलांचे मुलगी असल्यामुळे आपल्यावर प्रेमच नाही, असे विचित्र विचार मनात येऊ लागले. या सगळ्या गोंधळात मी बॅग पॅक करून घरी आले. मला अचानक पाहून आईला थोडी काळजी वाटली, पण काहीतरी कारण समोर करून मी सोमवारी परत जाणार आहे, हे वडिलांच्या भीतीने सांगून टाकले.
तीन-चार दिवस भरल्या घरात खूप छान वाटले. तरी एक दिवस वडील म्हणाले, ""असे अकरावीतच सारखे घरी पळून आलीस तर पुढे तू कशी शिकणार?'' त्यांच्या बोलण्याचा मला परत राग आला. रविवारी आईने माझ्या जाण्याची रात्री तयारी केली. कपडे, खाण्याचे पदार्थ- सारे पॅक केले. वडील रात्री थोडेसे उशिरा आले. येताना त्यांनी बालुशाही आणली होती. मला लहानपणापासून बालुशाही हा पदार्थ खूप आवडे, आमच्याकडे ती मिळेही खूप छान आणि चटपटीत!
दोन-तीन तासांचा प्रवास असल्याने सकाळी बसनेच जायचे ठरले. रात्री आईजवळ झोपूनही सुरक्षित वाटत नव्हते. झोपच येत नव्हती. अंगावर शहारा यायचा होस्टेल व उद्याची सकाळ आठवून! त्या रात्रीच मनात ठरवले, की पुढच्या वेळेस न घाबरता वडिलांना "मी लातूरला जाणारच नाही' असे सांगायचे.
सकाळी सहाची गाडी. आईने सगळे साहित्य भरले. वडील बस स्थानकावर सोडायला आले. सोबत नेहमीप्रमाणे झुपकेदार शेपटी हलवत "राणी'' नावाची आमची कुत्रीसुद्धा आली. ती बस सुटेपर्यंत माझ्या खिडकीकडे व माझ्याकडे आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी पाहत असे. तेव्हा गाड्यांना एवढी गर्दीही नसे. गाडी सुटली. डोळ्यातून घळघळ अश्रू गालांवर ओघळत होते. त्या क्षणाला वाटले, आपल्यावर कुणाचेही प्रेम नाही म्हणून ही शिक्षा!
एक तासाभराने माझे लक्ष अचानक खिडकीबाहेर गेले आणि मी दचकलेच. कोणीतरी ओळखीचे दुचाकीवरून बसचा पाठलाग करतेय असे जाणवले. काही वेळाने माझ्या खिडकीच्या समांतर बसला दुचाकी आली तेव्हा लक्षात आले- अरे! हे तर दादा! (मी वडिलांना दादा म्हणते.) आनंद व आश्‍चर्यमिश्रित नजरेला कळेचना, हे का बरे माझ्या बसच्या मागे पाठलाग करत वेगाने आले? मी बावरलेल्या नजरेने व थोड्याशा घाबरलेल्या अवस्थेत कंडक्‍टरला बस थांबवण्याची विनंती केली.
कंडक्‍टर वडिलांच्या परिचयाचे असल्याने त्यांनी लगेच बस थांबवली. वडील खिडकीशेजारी आले व खिडकीतूनच माझ्या हातात एक कॅरीबॅग दिली. म्हणाले, ""तुला खूप आवडते म्हणून बालुशाही आणली होती रात्री मी. सकाळी टेबलावरच राहून गेली बघ! घरी जाताच लक्षात आल्याक्षणी गाडीवर लगेच निघालो. बरं झालं, लवकरच गाठली गाडी!'' दुसऱ्या क्षणी कंडक्‍टरकडे वळून म्हणाले, "आता जाऊ दे गाडी.''
मला नजरेनेच निरोप देत दुचाकीवरून परत जाण्यास वळलेसुद्धा. माझी बस निघाली व मी त्या बालुशाहीच्या पॅककडे पाहतच राहिले. त्या फडक्‍यातून जणू प्रेमाचा झरा वाहत होता. ज्या वडिलांचा मी तीन महिने मनात राग घेऊन बसले... इतक्‍यापर्यंत, की माझ्यावर प्रेम नाही वगैरे वगैरे. ते थंडीत एक तास माझ्यासाठी, फक्त खाण्याचा पदार्थ देण्यासाठी बसचा पाठलाग करत आले. वरून काहीच न झाल्यासारखे "लवकरच गाठली गाडी' म्हणून परत गेलेसुद्धा. माझे अंतर्मन त्यांच्या न बोलता केलेल्या मायेने आणि प्रेमाने भरून आले. त्यांचा कष्टाळू चेहरा आठवून डोळे पुन्हा भरून आले. त्याच क्षणी ठरवले, की त्यांना शिकून खूप मोठे समाधान द्यायचे. मनातला घरच्यांचा राग काढून मी खूप अभ्यासाला लागले.
आयुष्यात जेव्हा जेव्हा खचले तेव्हा तेव्हा वडिलांच्या खंबीर व योग्य मार्गदर्शनाने परत उभी राहिले. त्यांच्या मायेच्या ओलाव्यामुळेच आज मी डॉक्‍टर होऊन आपल्या संसारात एका मुलगारूपी फुलपाखरासहित सुखी आहे ते केवळ वडील नावाच्या कल्पवृक्षामुळेच!
डॉ. शिल्पा गुरव

@ esakal
ha lekh mala khup avadala ani nantar rahval nahi mhanun ithe paste kela
I love my dada & mai(aai) so much.
Missing my native place too:(((